लोकांवर जुलूम होताना जे लोक शांत बसतात ते अपराधी असतात आणि असेच लोक स्वतःवर अत्याचार होण्यास कारणीभूत ठरतात - शहीद हजरत इमाम हुसैन
इस्लामिक तत्वांवर न चालणारा आणि जबरदस्ती खलिफा झालेला यजिद एक अन्यायी शासक हा लोकांवर जुलूम करणारा होता. त्यासाठी त्याच्याविरुद्ध कोणीही बोलत न्हवते. त्याची राजवट मान्य करावी यासाठी तो जबरदस्ती करू लागला. आणि इमाम हुसैन यांनाही त्यांच्या बाजूने व्हावे असा तो आग्रह करू लागला. परंतु शहीद हजरत इमाम हुसैन यांनी त्याचा तो प्रस्ताव फेटाळला. आणि त्याला शासक म्हणूनही त्यांनी स्वीकारला नाही.
इमाम हुसैन आपल्याला शासक म्हणून स्वीकारत नाही त्यामुळे यजीद आणि त्यांच्या सेनेने इमाम हुसैन आणि त्यांच्या नातेवाईकांना इराक च्या जवळ असलेल्या करबला मध्ये घेरले. यावेळी इमाम हुसैन यांना धरून लहानापासून वृद्धांपर्यंत ७२ लोक होते. आणि यजीद ची हजारोंची सेना. त्यांच्या समोर त्यांच्या पत्नी आणि सहा महिन्याच्या मुलाची हत्या होते. पण तरीही इमाम हुसैन यांनी माघार घेतली नाही. आपल्या विचारांवर ते ठाम राहिले. शेवटी यजीदने इमाम हुसैन यांचा छळ करून त्यांची हत्या केली तो दिवस म्हणजे मोहर्रम.
हजरत इमाम हुसैन हे फक्त इराक किंवा अरब देशांपूरते मर्यादित न्हवते. तर भारतात देखील त्यांचे मित्र होते. त्यांना मदतीसाठी त्यांनी पत्रही पाठवले होते. त्यांचे नाव मोहयाल राजा राहिब सिद्ध दत्त, हे एक ब्राह्मण राजा होते. हजरत इमाम हुसैन शहीद झाल्यानंतर देखील त्यांनी करबला मध्ये यजीद च्या विरोधात युद्ध केले होते. आजही शहीद हजरत इमाम हुसैन यांच्यासाठी लढलेल्या या जमातीला "हुसैनी ब्राह्मण' म्हटले जाते. प्रसिद्ध अभिनेता 'सुनीत दत्त' हे याच हुसैनी ब्राह्मण चे वंशज होते.
साधारण १३ व्या शतकाच्या शेवटी मोहर्रम ला ताजिया बसवण्याची परंपरा सुरू झाली. तैमुर लंग (लंगडा तैमुर) या शिया मुस्लिम असलेला भारतातील मोगल बादशहा. तैमुर लंग हा मोहर्रम ला दरवर्षी करबला, इराक ला जात असे. पण त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात तो खूपच आजारी असल्याने इराकला जाऊ शकत न्हवता. त्यासाठी त्याने शहीद हजरत इमाम हुसैन यांच्या कबरीची प्रतिकृती बनवण्याचे आदेश दिले. ती प्रतिकृती त्याला एवढी आवडली की त्याने ती प्रतिकृती बनवण्याचे फर्मानच काढले. आणि त्याच्या आयुष्यातील साधारण पणे तीन ते चार वर्षे दरवर्षी ही प्रतिकृती बनवली गेली. त्यानंतर ही एक परंपराच मुस्लिम समुदायात चालू झाली. आणि दरवर्षी मोहर्रम मध्ये हजरत इमाम हुसैन यांच्या कबरीची प्रतिकृती बनवली जाते. तैमुर लंग ज्या उझबेकिस्तान मधून आला होता आणि ज्या काझेकिस्तान मध्ये त्याचा मृत्यू झाला तिथेही ताबूत बसवत नाहीत. परंतु भारतामध्ये त्यांच्या मिरवणूका काढल्या जातात. समोर नाचणे गाणे होते. हे दुःखद आहे...
शहीद हजरत इमाम हुसैन यांच्या बद्दल बऱ्याच महान व्यक्तींनी आपली मते मांडली.
महात्मा गांधी म्हणतात - अन्याया विरोधात कशाप्रकारे जिकलं जाऊ शकतं हे मी हजरत इमाम हुसैन यांच्याकडून शिकलो. इस्लाम चा प्रसार हा तलवारी वर नाही तर हरजत इमाम हुसैन यांच्या शहीदत्वाचं हे फळ आहे. जे एक महान संत होते.
रवींद्रनाथ टागोर म्हणतात - न्याय आणि सत्य जिवंत ठेवण्यासाठी सैन्य आणि शस्त्रांची गरज नाही. बलिदान देऊनही विजय प्राप्त केला जाऊ शकतो. जसे इमाम हुसैन यांनी करबला मध्ये केले.
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात - इमाम हुसैन यांचे बलिदान हे सर्व समाजासाठी दिले गेलेलं बलिदान होते. हे बलिदान मानवतेचे एक महान आदर्श आहे.
अशा अगणित महान व्यक्तींनी हजरत इमाम हुसैन यांच्यावर आपले विचार व्यक्त केले.
मला विचाराल तर मी म्हणेल, अन्याया विरुद्ध लढण्याची आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध व्यक्त होण्याची प्रेरणा मला शहीद हजरत इमाम हुसैन यांच्याकडून मिळते. बिकट परिस्थितीतही सत्याच्या वाटेवरून चालण्याची शिकवण मला भेटते.
मी निर्भयपणे माझे विचार मांडतो आणि त्याबद्दल कशाचीही तमा बाळगत नाही. यासाठी माझे मोठे आदर्श शहीद हजरत इमाम हुसैन देखील आहेत. आपल्या कार्याप्रती असलेली निष्ठा. आणि त्याच्यासाठी स्वतःच्या आयुष्याचे केलेले समर्पण. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शहिद हजरत इमान हुसैन.
शहीद हजरत इमाम हुसैन यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी केलेल्या कार्यास, दिलेल्या लढ्यास आणि त्यांच्या विरमरणासाठी त्यांना विनम्र अभिवादन.
- पैगंबर शेख , सोशल ऍक्टिविस्ट
No comments:
Post a Comment