बौद्ध धम्म - महायान व हीनयान बौद्ध धम्म - महायान व हीनयान - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, July 29, 2021

बौद्ध धम्म - महायान व हीनयान

<img src="hinayana-and-mahayana-difference-in-buddhism.jpg" alt="difference between hinayana and mahayana in marathi"/>


यान म्हणजे संसारातील समस्त दुःखी व कष्टी सत्वांना दुःखातुन मुक्त करून निर्वाण सुखाकडे घेऊन जाणारा रथ 

किंवा मार्ग. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर साधारणपणे 100 वर्षांनी भंदत सब्बकामी यांच्या अध्यक्षतेखाली 

वैशालीमधे द्वितीय धम्म संगिती भरली होती. या धम्म संगिती मधे विनयाच्या काही गोष्टी बद्दल मतभेद झाले. काही 

तरुण नव दिक्षीत भिक्षु विनयाच्या नियमांना शिथील करून नवीन नियम तयार करण्यास उत्सुक होते. तर काही 

भिक्षु मात्र विनयाचे नियम जसे आहेत तसेच रहावेत यासाठी प्रयत्नशील होते. खालीलप्रमाणे विनयाच्या नियमांवरुन 

भिक्षुसंघात मतभेद झाले होते. हे सर्व मतभेद भोजनाचे प्रमाण, प्रकार व वेळ यासंबंधीत असलेल्या निर्बंधांमुळे 

निर्माण झाले होते.


1. भोजन विहारात शिजवणे.

2. भोजन स्वः ईच्छेनुसार शिजवणे.

3. भोजन विहारात करणे.

4. स्वः ईच्छेनुसार खाणे.

5. सकाळी उठल्यावर अन्नाचा स्वीकार करणे.

6. दानदात्याच्या ईच्छेनुसार अन्न घरी घेऊन येणे.

7. विविध फळे खाणे.

8. जलाशयात उत्पन्न वस्तूमात्रांना खाणे.

सुरुवातीला जरी विनयाच्या नियमांवरुन मतभेद झाले होते पण नंतर बुद्ध धम्म व संघ संदर्भात अनेकांच्या विचार 

सरणीमध्ये सुद्धा बदल होत गेले व कालांतराने महायान व हिनयान असे दोन पंथ तयार झाले. या दोन पंथांची 

भगवान बुद्ध व बोधिसत्व यांसंदर्भात वेगवेगळी मते होती.

महायान

विनयाच्या नियमांना बदलवून त्यामधे हवे तसे बदल करण्यासाठी नवदिक्षीत तरूण भिक्षु उत्सुक होते, ते संख्येने 

अधिक होते. ते स्वतः स आर्यमहासंघिक म्हणजेच महायानी म्हणवून घेऊ लागले. त्यांचे म्हणणे असे होते की, 

भगवान बुद्धाच्या शिकवणीचे उद्दिष्ट केवळ स्थविरांनाच धम्मलाभ व्हावा व विनयाचे काटेकोरपणे पालन केलेच गेले 

पाहिजे असे अजिबात नव्हते. विनयाच्या नियमांना शिथील करून संघामधे अनेकांना समाविष्ट करुन घेतले गेले 

पाहिजे. अधिक लोकांच्या उद्धारासाठी मोठे यानच सिद्ध आहे. असे म्हणत नवीन पंथ उदयास आला. जो महायान 

नावाने ओळखला जाऊ लागला. महायान पंथाने तथागताच्या कायेस लोकोत्तर घोषीत केले व ईश्वराचे स्वरूप दिले. 

महायानी भगवान बुद्धांच्या भौतिक देहाला विशुद्ध मानतात. सर्वज्ञता हा गुण अरहंतांमधे नसतो म्हणुन अरहंतांमधे 

सुद्धा दोष असतात. अशी महायान पंथामधे धारणा होती. त्यांनी भगवान बुद्धाचे अवशेष, चैत्य किंवा स्तुप, भगवान 

बुद्धाची मुर्ती व बोधिवृक्ष या सर्वांची पुजा करण्याची परंपराही चालु केली. त्यांनी भगवान बुद्धालाच नाव्हे तर अनंत 

बोधिसत्वानांही लोकोत्तर घोषीत करुन वेगवेगळी ईश्वर स्वरुप नावे दिली. आता बोधिसत्वांची ही ईश्वराप्रमाणेच 

पुजा व्हायला लागली. अनंत प्रकाशाचे देवता अमिताभ बुद्ध, भावी बुद्ध मैत्रेय, भुलोकाचे अवलोकन करणारे 

बोधिसत्व अवलोकितेश्वर, औषधाचे राजा भैषाज्यराज, धम्माचे राजकुमार मंजुश्री, महास्थानप्राप्त, वैरोचन, 

रत्नसंभव, अक्षोभ्य, स्थितीगर्भ, अमोघसिद्धी, समंतभद्र व आकाशगर्भ इत्यादी बोधिसत्वांची पुजा होऊ लागली. 







नवनवीन गाथा तयार झाल्या. भगवान बुद्ध व बोधिसत्वांचे नामस्मरण केल्याने संकटे व क्लेश दुर होतात असा 

समज निर्माण झाला, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना महायान प्रीय वाटु लागला. बुद्ध व बोधिसत्व लोकोत्तर 

झाल्यानंतर चातुर्महाराजिक, त्रायंतीश, यामा, तुषित, निर्माणरती, परिनिर्मितवशवर्ती, ब्रह्मपारिषद, ब्रम्हपुरोहित, 

महाब्रम्ह, परित्ताभ, अप्रमाणभा, आभास्वार, परित्रशुभ, अप्रमाणशुभ, शुभकृष्णक, वृहत्फल, अविह, अतप्य, सुदर्श 

व सुदर्शी इत्यादी स्वर्गलोक अस्तित्वात आले. ज्या लोकांना समाधी मार्गात फळप्राप्ती होत नाही त्या लोकांना फक्त 

बुद्ध व बोधिसत्व यांचे केवळ नामस्मरण केल्याने स्वर्गात जन्म मिळतो असा समज दृढ झाला.

महायान परंपरानुसार बोधिसत्व हे बुद्धत्व प्राप्ती प्रवासाच्या मार्गात ईतके पुढे गेले आहेत की ते कधीही हवे तेव्हा 

सम्यक संबद्ध होऊ शकतात पण अनेक लोक दुखी असताना आपण बुद्धत्व प्राप्त करणे म्हणजे स्वार्थीपणाचे 

लक्षण आहे, त्यामुळे बोधिसत्वांनी सम्यक संकल्प केला आहे की जोपर्यंत समस्त संसारातील प्राण्यांची दुःखातुन 

मुक्तता होऊन निर्वाण सुखाचा लाभ होत नाही तोपर्यंत बोधिसत्व बुद्धच होणार नाहीत. महायान व हिनयान मधील 

बुद्ध धम्माचे सर्वच मुळ ग्रंथ सारखेच आहेत.

महायान ग्रंथामधे हजारो सुत्रे आहेत व नऊ प्रमुख ग्रंथ हे हिनयान पेक्षा विभिन्न आहेत.

1. प्रज्ञापारमीता

2. अष्टसाहस्रिका

3. सद्धम्मपुंडरीक

4. ललितविस्तार

5. लंकावतार सुत्र

6. सुवर्णप्रभास सुत्र

7. तथागतगुह्यक

8. समाधिराज व

9. दशभुमीश्वर

हिनयान

विनयाच्या नियमांना शिथील करून त्यामधे बदल केल्याने मुळचा बुद्ध धम्म नष्ट होईल असे काहींचे मत होते. 

विनयाचे नियम हे प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण अध्यात्मिक विकासासाठी भगवान बुद्धानी बनविले आहेत. विनयाच्या 

नियमांमधे काळ, वेळ व परिस्थिती नुसार बदल करण्याचे तथागताने भिक्षुसंघास अधिकार दिले आहेत.

विनयाच्या नियमांचे परिपूर्ण पालन जर झाले नाही तर व्यक्तीचा सामाजिक व आध्यात्मिक विकास होणार नाही, 

अशी अल्पसंख्याक गटास खात्री होती. या अल्पसंख्याक गटामध्ये अनेक वयस्क स्थविरांची संख्या जास्त होती. 

परंतु संख्येच्या मानाने त्यांना अल्पमत होते. त्यांना व त्यांच्या स्थविरवादी म्हणजे बुद्धाच्या मार्गाने जाणार्या 

विचारधारेला सदोष समजले गेले. विनयाचे नियम काटेकोरपणे पाळणारे हे स्थविर अल्पसंख्याक होते. त्यामुळे 

त्यांना हिनयानी म्हटले जाऊ लागले. हिनयान्यांच्या विचारधारेला थेरवाद नावाने ओळखले जाऊ लागले. थेर म्हणजे 

भगवान बुद्धाच्या भिक्षुसंघातील प्रज्ञावान वयस्क भिक्षु. त्रिपीटकामधे अरहंत झालेले भिक्षु व भिक्षुनी यांनी 

आनंदाच्या भरात जे उदान म्हटले आहे त ते थेरगाथा व थेरीगाथा नावाने प्रसिद्ध आहे. हिनयान हा मुळचा बुद्ध धम्म 

होय. हिनयानी भगवान बुद्धाच्या कायेस लोकोत्तर न मानता भगवंताचे शरीर हे आपण सर्वांप्रमाणेच नैसर्गिक आहे 

असे मानत. सध्याचा भारतातील बुद्ध धम्म हा मुळचा हिनयानी बुद्ध धम्म आहे ज्याचा स्विकार डाॅ. बाबासाहेब 

आंबेडकरांनी केला आहे. महायान मुळे बुद्ध पुजा, बोधिसत्व पुजा, चैत्य पुजा, बोधिवृक्ष पुजा, बदलत्या काळानुसार 

सर्वच ठिकाणी अंतर्भूत झाली व सर्व सामान्य लोकांनाही त्याची आवड निर्माण झाली त्यामुळे हिनयानी लोकांनीही 

पुजा व वंदनेचा स्वीकार केला.

- राहुल खरे नाशिक | 9960999363





No comments:

Post a Comment